कचरा खेलेगा...

भारतीय क्रिकेट प्लेयर म्हटल्यावर चाहत्यांचा गराडा, सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी झुंबड, मुलाखती-पत्रकार परिषदांची लगबग, इन्स्टाग्राम-फेसबुक-ट्वीटर अकाऊंट हँडल करण्यासाठी स्वतंत्र टीम असं चित्र डोळ्यांपुढे उभं राहतं. पण सव्वाशे वर्षांपूर्वी असं काहीच नव्हतं.

तेव्हा क्रिकेट हा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा खेळ होता. भारतीय लोक हळूहळू तो शिकत होते, पण ब्रिटिशांना हरवणं त्यांना कठीण जायचं.

यूरोपियन विरुद्ध पारसीज पासून सुरु झालेली बॉम्बे प्रेसिडेन्सी टूर्नामेंट पुढे हिंदू जिमखाना संघ जोडून बॉम्बे ट्रँग्यूलर झाली. मग नंतर १९११-१२ च्या सिजनला इस्लाम जिमखान्याला खेळायचं आमंत्रण दिलं गेलं आणि टुर्नामेंटचं नाव झालं बॉम्बे क्वाड्रंग्युलर. आणि मग शेवटी १९३७ ला समाजातील इतर घटक जसे बुद्ध, ज्यू, ख्रिस्ती इत्यादी यांचा 'द रेस्ट' असा अजून एक संघ जोडला गेला आणि १९४५-४६ पर्यंत म्हणजे रणजी ट्रॉफीच्या उदयापर्यंत बॉम्बे पेन्टाग्युलर खेळली गेली.  

स्पृश्य-अस्पृश्यतेचा तो काळ होता. क्रिकेट टूर्नामेंटसुद्धा धर्मनिहाय होत्या. भारत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता. अजून धार्मिक वाद नको ह्या उद्देश्याने बॉम्बे पेन्टाग्युलर बंद करून रणजी ट्रॉफी सुरु केली गेली. ह्या अश्याच काळात उदयाला आला भारताचा पहिलावहिला वर्ल्ड-क्लास स्पिन बॉलर बाळू पालवणकर. अनेकांसाठी बाळू 'अस्पृश्य' होता पण त्याला संघात घेतल्याशिवाय ब्रिटिशांना हरवता येणार नाही हे मात्र सगळ्यांनाच ठाऊक होतं. 'लगान' सिनेमातला वाटावा असा हा प्रसंग प्रत्यक्षात घडला होता.

द बॉल स्टारटेड स्पिनिंग

१८७५ साली महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत धारवाडला बाळू पालवणकरांचा जन्म झाला. चामड्याशी संबंधित काम करणारे म्हणजेच चर्मकार कुटुंबात ते जन्मले. लहानग्या बाळूचे वडील सैन्यात होते. त्यांना बाळूसह चार मुलं. सैन्याने निकाली काढलेल्या वस्तूंच्या साह्याने बाळू आणि त्याचे भाऊ क्रिकेट खेळायला शिकले. 

बाळू पुढे पुण्याला आले. 17 वर्षांच्या या मुलाला पूना क्लबमध्ये नोकरी मिळाली, ते वर्षं होतं १८९२. पगार होता दर महिन्याला चार रुपये. युरोपियन मंडळींकरता तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची देखभाल करणं, रोलर फिरवणं, नेट प्रॅक्टिसची व्यवस्था बघणं ही सगळी कामं त्यांना करावी लागणार होती.

भारतात असणाऱ्या ब्रिटिशांपैकी त्यावेळचे सर्वोत्कृष्ट बॅट्समन होते जे. जी. ग्रेग. बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये ते युरोपियन संघातून खेळायचे. भारतात त्यांना प्रेमाने 'जंगली ग्रेग' असं म्हणायचे. 

एकदा पूना क्लबला प्रॅक्टिस करत असताना त्यांनी बाळूंना बॉल टाकायला सांगितलं. बाळूंच्या फिरकीचं कौशल्य पाहून ग्रेग चकित झाले. त्याच्या फिरकीचा सराव व्हावा, यासाठी ग्रेग आधी एक तास येऊ लागले. ग्रेग यांना आऊट केलं तर बाळूला आठ आणे मिळत असत. यातून दोन गोष्टी झाल्या - ग्रेग यांना चांगल्या दर्जाच्या फिरकीचा सामना करता येऊ लागला आणि त्या मुलाला बॉलिंगची, खेळण्याची नियमित संधी मिळाली.

बाळूंच्या फिरकीची जादू ग्रेग यांच्या सहकाऱ्यांनाही उमगली. त्यावेळी पुण्यातले हिंदू हे ब्रिटिशांच्या संघाला आव्हान देऊ इच्छित होते. बाळूंच्या फिरकीच्या बळावर आपण जिंकू शकतो, असा विश्वास त्यांना होता.

त्यांचं बॉलिंगमधलं कौशल्य पाहून पूना क्लबमध्ये त्यांना स्थान मिळालं खरं, पण बरोबरीची वागणूक मिळत नव्हती.

बाळूंना खेळण्याआधी आणि खेळून झाल्यावर वेगळं वागवलं जायचं. त्यांना वेगळ्या कपात चहा दिला जात असे. त्यांच्या जेवणासाठी वेगळी ताटवाटी असे आणि ती त्यांनाच धुवून ठेवावी लागत असे. त्यांना हातपाय धुवायचे असतील तर वेगळा माणूस पाणी आणून देत असे. एवढंच नाही तर मैदानावर विकेट घेतल्यावर त्यांना कोणीही टाळ्या वा पाठीवर थाप देत नसे. कोणी त्यांना कधीच हातात बॉल आणून दिला नाही. 

या अस्पृश्यतेच्या वागणुकीचा बाळूंनी कधी खेळावर परिणाम होऊ दिला नाही. युरोपियन संघाविरुद्ध जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बाळूंच्या फिरकीचा करिश्मा चालला आणि पूना क्लबने युरोपीय संघाला नमवण्याची किमया केली.

क्रिकेट अभ्यासक, संशोधक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी लिहिलं आहे की युरोपीय संघाला हरवल्यानंतर बाळूंचा साताऱ्यात हत्तीवरून सत्कार करण्यात आला. पुण्याला परतल्यानंतर विचारवंत, अभ्यासक आणि समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांच्या हस्ते बाळूंना गौरवण्यात आलं. 'बाळूंबरोबर खेळत असाल तर त्यांच्याबरोबरीने खा-प्या,' असा सल्लाही रानडेंनी दिला.

एका सार्वजनिक सभेत लोकमान्य टिळकांनी बाळूंच्या कामगिरीचं कौतुक केलं. समाजरचनेत तळाशी असणाऱ्या वर्गातील व्यक्तीचं जाहीर कौतुक केल्याने टिळकांवर टीकाही करण्यात आली, असं गुहा लिहितात.

१८९६ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. महाभयंकर अशी ती साथ होती. त्याच काळात मुंबईत क्रिकेटला बहर आला होता. म्हणून बाळू मुंबईत गेले. बॉम्बे बेरार अँड सेंट्रल इंडियन रेल्वे कंपनीने त्यांना नोकरी दिली.

हिंदू जिमखान्याकडून ते बॉम्बे क्वाड्रंग्युलर मध्ये खेळू लागले. १९०६ मध्ये या स्पर्धेत हिंदू विरुद्ध ब्रिटिश संघ असा मुकाबला रंगला. बाळूंचा समावेश असलेल्या हिंदू संघाने २४२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्रिटिशांचा डाव १९१ धावांतच आटोपला. हिंदू संघाने दुसऱ्या डावात १६० धावांची मजल मारली आणि ब्रिटिश संघासमोर २१२ धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र बाळू आणि इरशा या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्याने ब्रिटिशांचा डाव १०२ धावांतच आटोपला.

मॅचदरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकत्र जेवले. हिंदू जिमखान्याने बाळू आणि त्यांचे बंधू शिवराम यांना कॅफेतही प्रवेश दिला होता. एका क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने जातिभेदाच्या भिंती तुटल्या, असं 'द ट्रिब्यून'ने म्हटलं होतं. 'इंडियन सोशल रिफॉर्मर' या वृत्तपत्राने क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद मिटवला यावर प्रदीर्घ लेख छापला.

बारोनेट क्रिकेट क्लबचे डॉ. एम.ई. पावरी यांनी बाळूंना 'भारताचे विल्फ्रेड ऱ्होड्स' असं म्हटलं. ऱ्होड्स हे तत्कालीन श्रेष्ठ स्पिन बॉलर होते.

बाळूंची कीर्ती मुंबईपुरती मर्यादित राहिली नाही. ती कलकत्त्यापर्यंत पोहोचली. नाटोरच्या महाराजांनी देशभरातील सर्वोत्तम हिंदू क्रिकेटपटूंचा एक संघ बनवला. या संघाने ऑल युरोपियन कलकत्ता क्रिकेट क्लबला आव्हान दिलं. नाटोरच्या महाराजांनी तयार केलेल्या संघाने युरोपियन संघाला हरवलं. या संघात बाळू आणि त्यांचे छोटे बंधू शिवराम हेदेखील होते. बाळू यांच्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेले शिवराम आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध होते.

ऑल इंडियन टीम विथ २ पालवणकरस 

भारताबाहेर भारताचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशी टीम तयार करण्याचे प्रयत्न एव्हाना बारा वर्षं सुरू होता. तीन वेळा संघबांधणीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. अखेर १९११ मध्ये देशातले राजेमहाराजे, उद्योगपती यांनी ब्रिटिश प्रशासन, सनदी अधिकारी, पत्रकार, प्रशिक्षक यांच्या समन्वयातून भारतीय संघ तयार केला.

हा संघ निवडण्यासाठी मुंबईत निवड चाचणी सामने खेळवण्यात आले. सहा पारसी, तीन मुस्लीम, पाच हिंदू असा हा संघ होता. संघाचं नेतृत्व केलं पतियाळाचे २० वर्षीय महाराज भूपेंद्र सिंग यांनी. ती टीम अशी होती, 

महाराजा ऑफ पतियाळा (कप्तान), केखाश्रु मिस्त्री, मुकुंदराव पै, एच एफ मुल्ला, आर पी मेहेरहोमजी, बंगलोर जयराम, होरमसजी कांगा, जे एस वॉर्डन,  पालवणकर बाळू, पालवणकर शिवराम, सलामुद्दीन, शफाकत हुसेन आणि किल्व्हिडी शेषाचारी (यष्टीरक्षक). 

हा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात २३ सामने खेळवण्यात आले. त्यांपैकी १४ सामन्यांना प्रथम श्रेणी दर्जा देण्यात आला. तत्कालीन भारतीय संघाने यांपैकी १० सामने गमावले, २ अनिर्णित झाले तर २ मध्ये भारतीय संघाने विजय मिळवला.

बहुतांश सामन्यांमध्ये पराभूत होऊनही बाळूंचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं. बाळूंनी त्या दौऱ्यात १८.१४ च्या सरासरीने ११४ विकेट्स पटकावल्या. इंग्लंडमधल्या पत्रकारांनी, क्रिकेट समीक्षकांनी बाळूंच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली. कोणत्याही काउंटी संघाला बाळूंना आपल्या संघात घ्यायला आवडेल, अशा शब्दात बाळूंचं कौतुक झालं.

अ दलित कॅप्टन? 

१९१३ मध्ये हिंदू संघात बाळू यांच्याबरोबरीने शिवराम, विठ्ठल आणि गणपत हे तिघे भाऊही खेळू लागले. हिंदू संघाचे कर्णधार मुकुंदराव पै होते. पै यांचा गौड सारस्वत ब्राह्मण मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतानाच्या भाषणात पै यांनी बाळूंना टीमचा कॅप्टन करण्याची मागणी केली. बाळू हे संघातले अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांची कामगिरी सर्वोत्तम झाली, असा पै यांचा युक्तिवाद होता.

समाजरचनेत तळाशी असलेल्या 'अस्पृश्य' माणसाला कॅप्टनपदी नियुक्त करणं हे त्याकाळी जातीची उतरंड फिरवून टाकण्यासारखं होतं. हा मुद्दा केवळ मैदानावरील कामगिरीचा नव्हता, तर खोलवर रुजलेल्या मानसिकतेचा होता.

हिंदू जिमखाना संघाचे बाळू कॅप्टन झाले नाहीत. 'बॉम्बे क्रोनिकल' वर्तमानपत्रात यासंदर्भात अग्रलेखही छापून आला. तत्कालीन वाचकांच्या पत्रांमध्येही याचा उल्लेख दिसला होता. या वादामुळे बाळूंना टीम सोडावी लागली. त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये पाहायला मिळाल्या. याचदरम्यान महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला होता.

१९२० मध्ये आयोजित बॉम्बे क्वाड्रंग्युलर स्पर्धेत, नियमित कर्णधार पै आजारी पडले. बाळूंना वगळण्यात आलं होतं, मात्र त्यांचे बंधू विठ्ठल आणि शिवराम संघात होते. निवड समितीने पै यांच्याऐवजी देवधर यांची कॅप्टनपदी निवड केली. विठ्ठल आणि शिवराम पालवणकर देवधर यांना वरिष्ठ होते.

बाळू संघात नसणं, गणपत या चौथ्या भावाचा अकाली मृत्यू आणि कर्णधारपदापासून दूर राहावं लागणं या एकापाठोपाठ एक धक्क्यांतून विठ्ठल आणि शिवराम यांनी माघार घेतली.

कर्णधारपद नियुक्तीवेळी जातीचा मुद्दा अग्रणी ठरला यावरून या दोघांनी सविस्तर निवेदन दिलं. पालवणकर बंधूंच्या समर्थनार्थ निधीही जमा झाला. लोकांच्या विनंतीला मान देऊन बाळू आणि त्यांचे बंधू पुन्हा संघात परतले. बाळू यांना उपकर्णधारपद देण्यात आलं.

बाळूंचे धाकटे भाऊ विठ्ठल यांना काही वर्षांच्या संघर्षानंतर हिंदू संघाचं कर्णधारपद मिळालं. त्यांनी यशस्वी नेतृत्व करत विश्वास सार्थ ठरवला.

अस्पृश्य म्हणून शतकानुशतं हिणवलेल्या समाजाला क्रिकेटच्या मैदानात प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बाळू पालवणकरांचं १९५५ साली मुंबईत निधन झालं. 

पालवणकर असं भलंमोठं आडनाव असलेल्या बाळ यांनी पी. बाळू अशी आद्याक्षरं स्वीकारली होती. मुंबईतल्या प्रभादेवी या भागात एका रस्त्याचं 'पी.बाळू मार्ग' असं नामकरण करण्यात आलं आहे.

इतिहासाच्या कप्प्यात दुर्लक्षित राहिलेला बाळूंचा काळ लोकांसमोर यावा हीच इच्छा. 

    स्रोत: ESPNCricinfo










Comments

Popular Posts